बीड | Beed
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख प्रकरणातील सुनावणीसाठी पहिल्यांदाच कोर्टात उपस्थित राहिले. उज्ज्वल निकम यांच्यासारखा हायप्रोफाईल वकील हा खटला लढवत असल्याने आजच्या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले होते. ते न्यायालयात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी आपल्या युक्तिवादात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची सगळी कुंडली मांडली.
आजच्या सुनावणीला वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे आणि वकिलांची टीम उपस्थित होती. यावेळी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपींची ओळख परेड झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केस ओपन करण्याची मागणी केली. त्यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा सीडीआर कोर्टासमोर सादर केला. त्यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी हे पुरावे आपल्याला देण्यात यावेत, अशी मागणी केली.
आजच्या सुनावणीत काय घडले?
- आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे. या कंपनीने मस्साजोग गावातील शिवारात ३२ एकर जमिनीवर गोडाऊन केले. त्या ठिकाणी सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत.
- ८ ऑक्टोबर पासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली. आठ ऑक्टोबर रोजी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मीक कराड यांच्यासोबत कंपनीच्या अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली. वेळ सायंकाळी सात वाजता किती मिनिट झाली. वाल्मीक कराडने दोन कोटीची खंडणी मागणी करून काम थांबवा असे सांगितले. (या ठिकाणचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे)
- ९ ऑक्टोबर २०२४ थोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची खंडणी मागितल्याचे माहिती दिली. पोलिसात तक्रार द्यावी का? अशी विचारणा केली. त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका, असे सांगितले. त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही.
-२६ नोव्हेंबर २०२४ सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख आहे. तो कराडचा निकटवर्तीय आहे. साडेअकरा वाजता तो साइटवर गेला. शिवाजी थोपटे याला धमकी दिली. कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असे सांगितले. वाल्मीक कराडने सुदर्शन घुले मार्फत हा मेसेज दिला.
-२९ नोव्हेंबर २०२४ सकाळी साडेअकरा वाजता वाल्मीक कराड यांनी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदे यांना फोन केला. घुले याने सांगितले त्या पद्धतीने काम करा. अन्यथा कंपनी बंद करा, असे सांगितले. यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला होता. तो शिवाजी थोपटे हे ऐकत होते. थोपटे याने वाल्मीक कराडचा आवाज ओळखला.( वाल्मीक करड याच्या आवाजाच्या नमुनाचे पुरावे) शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता. - २९ तारखेला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा येथील कार्यालयात गेला व कराड यांना भेटला व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला. याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे.
- २९ तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता वाल्मीक कराड व इतर सर्व आरोपी विष्णू चाटेच्या केज येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन, पुरावे आहेत.
-६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे, हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या मसाजोग येथील ऑफिसमध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा. हा कंपनीच्या ऑफिस समोर होत असलेला वाद यासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना दिली हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली. दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले. पण या सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक ७ डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले.
-७ डिसेंबर २०२४ रात्री आठ वाजता वाल्मीक कराड याला घुले यांनी फोन केला. फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असे सांगितले, अशी कबुली घुले यांनी दिली आहे. (त्याचे पुरावे सादर केले आहेत)
-८ डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदुर फाटा येथे विष्णू चाटे सुदर्शन घुले याची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे यांनी वाल्मीक कराड यांचा मेसेज सुदर्शन घुलेला दिला. आडवे आले तर कायमचा धडा शिकवा. (या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत) - ९ डिसेंबर २०२४ दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केज बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. आमचे काही होऊ शकत नाही. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार आहे. असा तब्बल ३२ मिनिट युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला.
वाल्मिक कराडच्या वकिलांची काय मागणी?
उज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत. परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेले नाही. हे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे. आजही अर्ज केला आहे. हे सर्व पुरावे, कागदपत्रे मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही. त्याशिवाय चार्जफ्रेम करता येणार नाही.
यावर माननीय न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत, असे आदेश दिले. यावर निकम यांनी कागदपत्र आम्ही देतो, केस पुढे घेऊन जाऊ शकतो, असे म्हणणे मांडले. यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन झाले असे होत नाही.
यावेळी आरोपीचे वकील यांनी गोपाल कृष्ण केसचा संदर्भ दिला. एक तासात संपूर्ण मागणी केलेली कागदपत्रे दिले जातील, असे उज्वल निकम यांनी सांगितले. यावर कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी वाल्मिक कराडच्या केली. माननीय न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख १० एप्रिल दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा