पुणे (प्रतिनिधी)
विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर रिल स्टार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर पडताच संतोष पंडित यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, लोकशाहीत जनताच मालक असून आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे थांबवणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. घडलेला संपूर्ण प्रकार हा आपल्यासाठी एक मोठा धक्का होता, मात्र सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आपला देश आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संतोष पंडित यांनी, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील जनतेसह प्रसारमाध्यमांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की, ते जे काही काम करत आहेत त्याला केवळ ‘समाजकार्य’ न म्हणता तो त्यांचा संविधानिक अधिकार मानला गेला पाहिजे. आपण आपल्या या घटनात्मक अधिकाराचा वापर करून आधीही भूमिका मांडत होतो आणि यापुढेही ती मांडतच राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत आपण थांबणार नाही, असा ठाम पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
दिनांक २ सप्टेंबर रोजी संतोष पंडित यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एका ३६ वर्षीय महिलेने पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर व्हिडिओमुळे आपल्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीच्या आधारे कोथरूड पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी केली होती.
दरम्यान, पुणे न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान पंडित यांच्या वकिलांनी बाजू मांडताना स्पष्ट केले की, व्हिडिओतील वक्तव्ये ही महिलांच्या विनयभंगाच्या कक्षेत मुळीच येत नाहीत. पंडित यांचा कोणाचाही विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि त्यांनी वापरलेल्या शब्दांचा अर्थ लैंगिक स्वरूपाचा नव्हता, असा युक्तिवाद वकिलांनी केला. याशिवाय, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये कमाल तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेचीच तरतूद असल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती. वकिलांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत पुणे न्यायालयाने संतोष पंडित यांना जामीन मंजूर केला, ज्यानंतर त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली.




