अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मराठी भाषा, आपले साहित्य आणि आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलने ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित 17 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
संमेलन अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, स्वागताध्यक्ष नगरसेवक सुरेश बनसोडे, आ. संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, सचिन जगताप, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संयोजन समिती सदस्य संजय खामकर, जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, प्रा. गणी पटेल, बापूसाहेब भोसले, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनिल गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे आदी मान्यवर यावेळी विचारपिठावर उपस्थित होते. यावेळी मंत्री भरणे म्हणाले, मी राज्याचा कृषी मंत्री असलो तरी आधी मी एका शेतकर्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकर्यांचे दुःख, शेतकर्यांच्या वेदना, शेतकर्यांची कष्ट, त्यांच्या अडीअडचणी, समस्या या मला चांगल्या माहीत आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले, शब्दगंधच्या माध्यमातून सुरू झालेले ही साहित्य संमेलनाची परंपरा इथून पुढच्या काळातही अशाच प्रकारे निरंतरपणे चालू राहील. यावेळी प्रा डॉ. गणी पटेल व सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारत गाडेकर, वसंत डंबाळे, शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, हौशीनाथ बोर्डे, दिगंबर गोंधळी, दत्तू रसाळ आणि सहकार्यांनी उद्घाटनापूर्वी शानदार शाहिरी जलसा कार्यक्रम सादर केला. या सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी केले. प्राचार्य जी. ढाकणे, प्रा. डॉ. अशोक कानडे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा. डॉ. अनिल गरजे, सुभाष सोनवणे, बबनराव गिरी, रविंद्र दानापुरे, स्वाती ठुबे, हर्षल आगळे, राजेंद्र चोभे, रमेश वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.




