पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegav Phata
नेवासा न्यायालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री माणिक कोकाटे यांचे विरोधात शेतकरी संघटनेने धाव घेतली आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते . परंतु सत्ता येऊन अनेक महिने उलटून गेले तरीही अद्याप पर्यंत कर्जमाफीचा विषय या सरकारने घेतलेला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही असे स्पष्टीकरण या सरकार तर्फे देण्यात आले. शेतकरी मतांसाठी केलेली ही शुद्ध फसवणूक असल्याने शेतकरी संघटनेतर्फे ठिकठिकाणी 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी सांगितले.
आधीच नैसर्गिक कारणामुळे होणारे शेतीचे नुकसान व पिकांचे कमी भाव व वाढत असलेली महागाई व कर्जाच्या डोंगराने त्रस्त शेतकरी हैराण आहे. त्यात कर्जमाफीची पूर्तता न करता शेतकर्यांकडे सक्तीची वसुली करण्यात येणार असल्याने शेतकरी धास्तावले असून सरकारबद्दल रोष दिसून येत असल्याने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून फसवणूक गुन्हे दाखल करण्यात येत आहे. 19 एप्रिल 2025 रोजी नेवासा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली असून नंतर 24 एप्रिलला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर येथे तक्रार दिलेली आहे. ज्यात वरील आरोपींनी निवडणुकीपुर्वी शेतकरी कर्ज माफीचे खोटे आश्वासन देवुन फसवणूक केली असल्याचे नमूद आहे.
बीएनएस कलम 171, 316 (2), 318 (4), 3 (5) 111 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नेवासा न्यायालयात शेतकरी संघटनेने केली आहे. यावेळी फिर्यादी तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे सह, राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, जिल्हा उपाध्यक्ष हरिअप्पा तुवर, तालुकाध्यक्ष अशोक काळे, युवाध्यक्ष डॉ. रोहीत कुलकर्णी, नरेंद्र काळे, युवराज जगताप, विश्वास मते, किरण लंघे, कैलास पवार, साहेबराव चोरमल, डॉ. दादासाहेब आदिक, दत्तात्रय निकम, सोमनाथ औटी, रामदास माकोणे आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा लढण्यासाठी अॅड. बाळासाहेब कावळे, अॅड. ज्ञानेश्वर शिरसाठ हे काम पाहत आहेत.





