Monday, July 27, 2026
HomeनगरShirdi : नगरपरिषदेच्या एमएसएफ जवानांकडून युवकाला बेदम मारहाण

Shirdi : नगरपरिषदेच्या एमएसएफ जवानांकडून युवकाला बेदम मारहाण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्रद्धा आणि सबुरीचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या नगरीत नगरपरिषदेच्या एमएसएफ जवानांकडून एका युवकाला रविवारी काठीने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे, ज्यामुळे शहरातील शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवार 2 ऑगस्ट रोजी शहरातील भीमनगर परिसरात विकास भालेराव नावाचा युवक उभा असताना नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी त्याची झडती घेऊन फक्त तंबाखू-माव्यामुळे त्याला आंबेडकर नगर परिसरात नेले आणि चार कर्मचार्‍यांनी मिळून काठीने बेदम मारहाण केली, असा आरोप भालेराव कुटुंबीयांनी केला आहे.

- Advertisement -

युवकाने जेव्हा शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली, तेव्हा गुन्हा दाखल न करता केवळ वैद्यकीय तपासणी करून घरी पाठवण्यात आले. ही अधिक चिंतेची बाब आहे. या प्रकारामुळे पोलीस आणि एमएसएफ कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होतो आहे. विकास भालेराव म्हणतो, माझ्या खिशात फक्त सुपारी आणि तंबाखू होती. त्यावरून मला उचलून चौघांनी मिळून मारहाण केली. मला गुन्हेगार समजून रस्त्यातून उठवले. गेल्या काही महिन्यांपूर्वी घडलेल्या शिर्डीच्या हत्याकांडानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी रात्रंदिवस पेट्रोलिंग करून गुंडगिरीला लगाम घातला होता. मात्र आता एमएसएफच्या दडपशाहीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याआधी शहरातील सुरक्षेसाठी नियुक्त केलेले कर्मचारीच नागरिकांवर हात उगारत असतील तर प्रशासनावर विश्वास राहील का? असा रोष जनतेतून उमठत आहे.

या घटनेनंतर शहरवासीयांमध्ये संताप उसळला असून शिर्डी पोलीस कुठे आहेत? कायदा हातात घेण्याचा परवाना नगरपरिषद कर्मचार्‍यांना कुणी दिला? असा सवाल उभा राहत आहे. या प्रकरणात एमएसएफ कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल न केल्यास मंगळवारी उपोषण छेडण्याचा इशारा भालेराव कुटुंबाने दिला आहे. शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा सुरक्षा यंत्रणांवरचा विश्वास पूर्णपणे उडेल आणि शहरात प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेसाठी नेमलेलेच जर धोकादायक बनले तर शिर्डीकरांनी विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न आता शिर्डीकरांना पडला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...