मुंबई | Mumbai
सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून (Andheri Bypoll) जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल होण्यास दोन दिवस उरले असताना ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण ऋतुजा लटके यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा अद्याप मुंबई महापालिकाने स्वीकारलेला नाही. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गंभीर आरोप केला आहे.
परब म्हणाले, ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये, यासाठी शिंदे गटाकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत लिपीक आहेत. मात्र, त्यांच्या नोकरीचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक मंजूर केला जात नाही. त्यासाठी पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव आणला जात आहे.
शिंदे गट ऋतुजा लटके यांच्यावरही दबाव आणत आहे. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा, तुमचा नोकरीचा राजीनामा लगेच मंजूर होईल, असे शिंदे गटाकडून लटके यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटात प्रवेश केल्यास ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाची ऑफरही असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा अनिल परब यांनी केला.