नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पडद्यामागे काय सुरू आहे, याचा अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी दिल्लीत सकाळी पत्रकार परिषद घेत आपल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांनी आमच्या समोर शपथ घेतल्या, कोणी आई, कोणी मुलीची तर कोणी साईबाबांची शपथ घेतली. पण अर्ध्या रात्री गायब झाले. आता गद्दार खासदारांना सोडणार, राज्य आता गप्प बसणार नाही. आम्ही आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे, असा गंभीर इशारा खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना दिला आहे.
संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
काल रात्री मला १०.३० ते ११ वाजता महत्त्वाच्या व्यक्तीने मला फोन केला. तो म्हणाला की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतले जात आहे. मी त्याला विचारले भाव काय आहे. तो म्हणाला तोच ५० कोटी रुपयांचा हमीभाव आहे. यापैकी १५ कोटी आज रात्री दिले जाणार आहेत. त्याशिवाय हे खासदार विमानात बसायला तयार नव्हते. अशाप्रकारे पक्ष फोडले जात असतील तर देशात निवडणूक लढण्याला अर्थ नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, आमच्या शिवसेनेत या
संजय राऊत यांनी तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेच्या गैरवापरावर बोट ठेवत थेट आरोप केला, “खासदार ओमराजे निंबाळकर काल पुण्यात होते. सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल कोर्टात लागणार आहे. ‘आम्ही हा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही आमच्या शिवसेनेत (शिंदे गटात) या’, असे थेट आमिष आणि दबाव ओमराजेंवर टाकण्यात आला आहे. हा निकाल बदलण्यासाठी या खटल्याचा निकाल मुद्दाम २० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे!”




