Friday, July 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, लाडकी बहीण सोबत…; उध्दव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, लाडकी बहीण सोबत…; उध्दव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा. महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषदे वेळी केली.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उध्दव ठाकरे म्हणाले, राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषत: अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलेय असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत. गेल्या जानेवारीपासून राज्यात १०४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. १० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही. पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही.

हे ही वाचा: देवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीवर उध्दव ठाकरेंच स्पष्टीकरण; म्हणाले, “ना ना करते प्यार…”

चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत. त्यामुळे डबल इंजिन सरकार आलेय, कसेबसे एनडीएचे सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेय. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा, असे त्यांनी म्हटले.

उध्दव ठाकरेंनी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारवर देखील टीका केली. त्यांनी सांगितले की, ‘उद्यापासून अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडेल हा गाजरासारखा असेल. कारण निधी खर्च होणार नाही. घोषणांचा पाऊस खूप झाला. सरकारला संवेदना असतील तर गेल्या २ वर्षांत केलेल्या घोषणांची किती पूर्तता झाली हे खऱ्या मनाने त्यांनी सांगावे. खोटे सरकार याला म्हणतात.

केंद्र आणि राज्य हे महागळती सरकार आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली. मंदिर आणि पेपर लीक होत आहे. आम्ही काही म्हणणे मांडले तर ते आमच्यावर आरोप करतात. आता अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले जातील.’

लाडली बहिनासोबत लाडला भाऊ योजना आणा
लाडका भाऊ योजना आणा, माता भगिनींना लाभ देणार तसे भावानांही द्या. महिला कर्तृत्वान झाल्या आहेत. तुम्ही भेदभाव करू नका. महिला पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना आणा. योजनेची चॉकलेट देऊ नका. लोकांची सहनशक्ती संपली आहे. जनता भोळी राहिली नाही. कुणीही यावे गाजर दाखवून काम करून घ्यायचे या गोष्टी जुन्या झाल्या. लाडकी बहीण, लाडका भाऊ आणल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका. त्यांचे चंद्रपूरचं भाषण ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात.या व्यक्तीकडे अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका असा टोलाही उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला आहे.

पोलीस भरतीकडे लक्ष द्या
पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत. भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही. अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत. बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या