मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) आणि भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात हनीट्रॅप वरून चांगलाच वाद पेटला आहे. त्यातच काल (रविवारी) एकनाथ खडसे यांचा जावई डॉ.प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील (Pune) उच्चभ्रू खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर हे राजकीय षडयंत्र असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.त्यावर आज शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांना या कारवाईनंतर आसुरी आंनद झाला असल्याचे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “पुण्यातील रेव्ह पार्टी संशयास्पद वाटत आहे. चार दिवस वॉच ठेवून ही कारवाई केली आहे. इतका वॉच जर पहलगाममध्ये ठेवला असता तर आज २६ बहिणींचे कुंकू पुसले नसते. तुम्ही काल बघितले असेल गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता. हा असुरी आनंद गिरीश महाजन यांना का व्हावा? खडसेंचा जावई पकडला गेला त्यांना अटक केली, आपण मंत्री आहोत हे भान महाजनांना नसावे का? काल ज्याचा उल्लेख फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मोकाट सुटलेला सांड असा केला ते खरं आहे. हाच सांड फडणवीस यांना अडचणीत आणणार”, असेही राऊत यांनी म्हटले.
तसेच “महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व गुंड, दरोडेखोर, बलात्कारातील गुन्ह्यातील आरोपी यांना घेऊन भाजप पक्ष उभा केला जात आहे. त्यांना आता रवींद्र चव्हाण यांची साथ मिळत आहे. नैतिकता ही या राज्याच्या राजकारणात राहूच नये अशा प्रकारची भूमिका भाजपच्या लोकांची आहे. काल जो रेव्ह पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल तर या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि जी काही कठोर कारवाई असेल ती होईल. पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद होता त्यात ते नाचायचेच बाकी राहिले होते, हे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून दिसून येत होते, “असेही संजय राऊत यांनी म्हटले.




