मुंबई । Mumbai
संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबईतील सर्व शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामी रचित ‘मनाचे श्लोक’ शिकवणे सक्तीचे करावे, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत त्या याबाबत रितसर प्रस्ताव मांडणार असून, त्यांच्या या मागणीमुळे आता शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईतील केवळ महानगरपालिकेच्याच नव्हे, तर खासगी आणि अनुदानित अशा सर्वच शाळांमध्ये मनाच्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात असावा, असे त्यांनी म्हटले आहे. शाळांमध्ये सर्वधर्मीय मुले शिक्षण घेत असतात, त्यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावे, त्यांच्यात देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावे आणि त्यांचे वर्तन आदर्श असावे, हा या मागणीमागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
मनाच्या श्लोकांचे महत्त्व अधोरेखित करताना पेडणेकर यांनी याच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक फायद्यांकडेही लक्ष वेधले. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची आहे, त्याच धर्तीवर मनाच्या श्लोकांसाठी दररोज १५ ते २० मिनिटांचा स्वतंत्र तास ठेवण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. मनाच्या श्लोकांचे पठण केल्यामुळे मुलांचे उच्चार स्पष्ट होतात आणि त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मोठी मदत होते. हे साधे पण प्रभावी प्रयोग मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या मागणीवरून निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य वादावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही मागणी कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून, एक आदर्श नागरिक घडवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, समर्थ रामदास स्वामींच्या या साहित्याचा अभ्यासक्रम सर्व समाजातील विद्यार्थ्यांना मिळावा, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या या विधानावरून सध्या राजकीय चर्चांना तोंड फुटले असून, आगामी काळात महापालिका प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, महापालिकेतील इतर राजकीय पक्ष आणि नगरसेवक या मागणीला कितपत पाठिंबा देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सर्व शाळांमध्ये हा अभ्यासक्रम लागू करण्याबाबत तांत्रिक आणि कायदेशीर बाबी काय असतील, तसेच शिक्षण विभाग यावर कशी प्रतिक्रिया देतो, यावरच या प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.





