
मुंबई | Mumbai
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेमधील ९ पैकी पाच खासदार फुटणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची केवळ चर्चाच असली आता हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. मातोश्रीवर नुकत्याच बोलवण्यात आलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे नऊपैकी पाच खासदार गैरहजर होते. त्यामुळे दुखावलेल्या उद्धव ठाकरे यांनी, ‘ज्यांना जायचं आहे त्यांना जबरदस्तीनं हात धरुन थांबवण्यात काय अर्थ’, अशी खंतही बोलावून दाखवली होती.
ठाकरे गटाच्या खासदारांच्या फुटीच्या चर्चा जोर धरत असतानाच उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या अफवा असून खासदार फुटीचे दावे फेटाळून लावले आहे. आमचा आमच्या खासदारांवर अंधविश्वास असल्याचे म्हटले असले तरी अंतर्गत स्तरावर ठाकरे गटालाही आपले काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते फुटू शकतात, याची जाणीव असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीवरुन हे खासदार फुटल्यास पुढे काय करायचे, यादृष्टीने नवी रणनीती राबवण्याचे काम सुरु झाले आहे.
खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका! सर्व खासदार आपल्यासोबत आहेत, असे सोमवारी पार पडलेल्या ईशान्य मुंबईच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर सांगितले. खासदार आपल्यासोबत असल्याचा विश्वास पक्षप्रमुखांनी बोलून दाखवला. या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश पाठवण्याचा उद्देश होता. जे खासदार फुटणार अशा बातम्या समोर येत आहेत, त्या त्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खासदार आपल्यासोबत असल्याचे सांगत पक्ष संघटित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांच्या फुटीच्या बातम्यांच्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोलसाठी सध्या प्रयत्न करण्यात येत आहे. खासदार गेले तरी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत राहतील, असा प्रयत्न आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु असल्याचे समजते. त्यादृष्टीने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचे काम पक्षाकडून सुरू असल्याचे समजते.
खासदारांकडे मागितले स्पष्टीकरण
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे आपल्यासोबत आहेत, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. ज्या खासदारांसंदर्भात संशय व्यक्त केला जातोय, त्या खासदारांना सुद्धा स्पष्टीकरण देण्याच्या सूचना ठाकरे गटाकडून करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या बैठकीला आपण अनुपस्थित का राहिलो? हे सुद्धा कार्यकर्त्यांना सांगा व पक्षाची एकजूट राहू द्या, अशा सूचना सुद्धा उद्धव ठाकरेंनी बैठकीला अनुपस्थित असलेल्या खासदारांना दिल्या आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनुपस्थित तेच खासदार काही दिवसांपूर्वी ‘मातोश्री’वर झालेल्या ठाकरेंच्या खासदारांच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित होते. तेव्हापासूनच शिंदेंच्या शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त चार खासदार हे ‘मातोश्री’वर बैठकीला उपस्थित होते. विविध कारणं देणारे पाच खासदार १३ जून रोजी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले होते. ते खासदार रविवारीसुद्धा बैठकीला अनुपस्थित होते. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना त्यामुळे या पाच खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेपासून आणि प्रमुख नेत्यांपासून दुरावा कायम ठेवण्याचा विचार केला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.




