अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून राज्य शासनामार्फत 1 मे पर्यंत आराधना वसुंधरेची हे अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातही शनिवारी व रविवारी शहरातील जलस्त्रोतांची साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. या अभियानात नागरिक व स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहरात शनिवारी (26 एप्रिल) नागापूर पूल जवळ, व स्टेशन रस्त्यावरील पूल जवळ सीना नदी पात्र, लगतचा परिसर व रविवारी (27 एप्रिल) अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर इलाक्षी शोरूम जवळ, कल्याण रस्त्यावर असलेल्या पुला जवळील सीना नदी पात्र, लगतचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. यासह आठरे पाटील पब्लिक स्कूल येथील विहीर, बाळाजी बुवा विहीर येथे अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी व स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी यात सहभागी व्हावे, वसुंधरेचे जतन, हेच अहिल्यानगरचे वचन यानुसार वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
स्वयंसेवक म्हणूनही सहभागी व्हावे व या कार्यात मदत करावी, त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख अशोक साबळे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. आराधना वसुंधरेची या अभियानातून जलस्त्रोतांचे शुद्धीकरण होऊन पाण्याचा दर्जा सुधारेल. जलप्रदूषण कमी होऊन नागरिकांसह जलजीवन वाचेल. पाण्यातील जैवविविधता (मासे, जलवनस्पती) सुरक्षित राहतील व पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रिड्यूस, रीयूज, रिसायकल या पर्यावरणपूरक तत्त्वांवर कार्य करणार्या संस्थांचा 1 मे रोजी सन्मान करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती निर्माण करणे. रिड्यूस, रीयूज, रिसायकल तत्वांचे पालन करणार्या संस्थांना प्रोत्साहन देणे, राज्य शासनाच्या योजनेसाठी निवडक उपक्रमांचा प्रातिनिधिक आदर्श निर्माण करणे, या उद्देशाने हा सन्मान करण्यात येणार आहे.