कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
रब्बी हंगामात पिकांना पाण्याची फार आवश्यकता असून देखील पाटबंधारे विभागाने कुठल्याही प्रकारचे आवर्तन जाहीर न केल्याने
शेतकरी बांधवांवर मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळी रोटेशनच्या तारखा कधी जाहीर होणार? असा प्रश्न उपस्थितीत करून पाटबंधारे विभागाने शेतकर्यांचा अंत पाहू नका अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्नेहलता कोल्हे यांनी दिला आहे.
पाटबंधारे खात्याकडून उन्हाळ्यात तीन आवर्तने मिळतीलच अशी आपेक्षा शेतकरी बांधवांना होती. एप्रिल महिना सुरू होऊन देखील आवर्तनाची तारीख पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या नाही, विहिरींची पाण्याची पातळी देखील खुपच कमी झाल्याने तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
धरणात पाणीसाठा मुबलक असताना देखील पाटबंधारे विभागाने आवर्तना बाबतचे नियोजन करणे गरजेचे असताना देखील पाटबंधारे विभागाने तसे न केल्याने पाणीवाटपाबाबत पाटबंधारे विभागाचे धोरण नेमके आहे तरी काय? हे तरी शेतकरी बांधवांना सांगितले पाहिजे. पाणी मागणी वाढलेली आहे. धरणातही पाणीसाठा पुरेशा प्रमाणात आहे. मग यापूर्वीच मार्चमध्येच उन्हाळी पहिले आवर्तन मिळालेच पाहिजे होते.
परंतु याबाबत देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता एप्रिलला आवर्तन सुरू होईल तोपर्यंत शेतकर्यांची पिके हाताबाहेर गेलेली दिसतील मग धरणातील पाण्याचे करणार काय त्यात वाढ होणार आहे का? अशी विचारणा सौ. कोल्हे यांनी पाटबंधारे विभागाला केली आहे.पाटबंधारे विभागाने शेतकर्यांचा अंत पाहू नका.
उन्हाळी आवर्तनाच्या तारखा त्वरीत जाहीर करा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची पाटबंधारे खात्याने गंभीरपणे दखल घ्यावी, असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिला.