अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रेशनवर वितरीत करण्यात येणारा गहू हा पाणी मारून ओला करण्यात आलेला होता. तसेच ओला झालेला हा गहू तालुक्याच्या ठिकाणी वितरीत करण्यात आला होता. मात्र, पाण्याने ओला असणारा हा गहू अनेक तालुक्यात संबंधीत रेशन दुकानदारांनी उतरवून घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून सावध भूमिका घेण्यात आली असून खराब धान्य रेशन दुकानदारांनी स्वीकारुच नये, अशा सुचना यापूर्वीच देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नगर एमआयडीसी येथून वखार महामंडळाच्या गोडावूनमधून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला धान्यांचा पुरवठा होतो. या ठिकाणी पुरवठा विभागाच्यावतीने ठेकेदाराची नेमणूक करण्यात आलेली असून या ठेकेदारामार्फत गहू आणि तांदूळाचा तालुकानिहाय वाटप करण्यात येते. मात्र, या ठिकाणाहून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात पाठवण्यात आलेल्या गव्हावर चक्क पाणी मारल्याचे दिसून आले. रेशनचा हा गहू ओला असल्याने शेवगाव, राहाता, नेवासा या तालुक्यात रेशन चालकांनी तो उतरवून घेण्यास नकार दिला. तसेच याबाबत जिल्हा पातळीवर तोंडी तक्रार केली.
दरम्यान, याबाबत नगरला पुरवठा विभागाकडे याप्रकरणी चौकशी केली असता, नगरला ज्या ठिकाणी ट्रकमध्ये गव्हाचे लोडींग होते. त्या ठिकाणी गव्हाचा फुफाटा (धान्यांची धूळ) शांत करण्यासाठी धान्याच्या गाड्यावर पाणी फवारण्यात येते. यात काही गाड्यावर जादा प्रमाणात पाणी फवारण्यात आल्याने त्यातील गहू भिजला आहे. तसेच या पूर्वी तालुका पातळीवर रेशन दुकानदार यांना खराब धान्यांचा पुरवठा झाल्यास तो स्वीकारूच नका, असे आदेश आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शेवगावच्या रेशन दुकानदारांमध्ये असंतोष
जिल्ह्यात सर्वाधिक भिजलेला गहू हा शेवगाव तालुक्यातील रेशन दुकानदारांना पाठवण्यात आला होता. या ठिकाणी आलेला गहू भिजेला असल्याने शेवगाव तालुक्यातील दुकांनदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती तालुक्यातील रेशनचालकांनी दिली.




