अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात प्रभावी व जबाबदार पोलिसिंगसाठी कडक भूमिका घेत, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सोमवारी (4 मे) व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे व विविध शाखांच्या प्रभारी अधिकार्यांशी संवाद साधला. नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करू नका, डायल 112 सेवा तत्परतेने राबवा. अडचणी आल्यास निर्धास्तपणे सांगा, मी तुमच्यामागे ठाम उभा आहे; मात्र चुकीचे काम करणार्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
शनिवारी (2 मे) पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सकाळी सुदर्शन यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) सोमनाथ वाकचौरे उपस्थित होते. डायल 112 या आपत्कालीन सेवेसंदर्भात त्यांनी विशेष भर देत प्रत्येक कॉल गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या. कोणताही कॉल क्लोज न करता नागरिकांना वेळेत मदत करा. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र दिवस सुरू करा आणि नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात वाढत्या ड्रग्स तस्करीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले की, अशा अवैध धंद्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. ड्रग्ससह सर्व प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाई करा. तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने निपटारा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सोनसाखळी चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने गस्त वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः रात्रीच्या वेळी पायी गस्त करण्यावर त्यांनी भर दिला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हेच पोलिसिंगचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांसाठी हेल्मेट सक्ती
पोलिसांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देत एसपी सुदर्शन यांनी दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट वापरणे अनिवार्य केले आहे. सेवेत असताना स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची आहे. प्रत्येक पोलिसाने हेल्मेट वापरलेच पाहिजे, असे आदेश देत त्यांनी सर्व प्रभारी अधिकार्यांना याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.





