मुंबई | Mumbai
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI Series) सुरू आहे. या मालिकेत नागपूर येथील जामठा क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला आहे. त्यामुळे मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.
भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) तर जॉस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लंड संघाचे कर्णधारपद असणार आहे. दुसरा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो वा मरो’असा असणार आहे. या सामन्यात विजय संपादन करून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडच्या संघाचा प्रयत्न असणार आहे.विशेष म्हणजे २०२२ मध्ये भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये शेवटचा टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना या मैदानावर खेळविण्यात आला होता. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या मैदानावर प्रथमच सामना खेळणार आहे.
भारत आणि इंग्लंड संघामध्ये या मैदानावर ५ सामने खेळविण्यात आले असून भारताने (India) ५ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर इंग्लंड अद्यापही आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. नागपूर येथील जामठा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात हर्षित राणा , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल या खेळाडूंनी भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
दरम्यान, नागपूर (Nagpur) येथे झालेल्या पहिल्या सामन्यात उजव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे विराट कोहलीने (Virat Kohli) माघार घेतली होती. मात्र, आजच्या सामन्यात विराट कोहली कमबॅक करण्याची शक्यता आहे. तसेच तो संघात परतल्यास त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. यासाठी त्याला केवळ ९४ धावांची गरज आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ११ हजार धावा पूर्ण करण्याची संधी असून त्याला यासाठी १३२ धावांची आवश्यकता आहे.
सलिल परांजपे, नाशिक