अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लग्नाचे वर्हाड घेऊन जाणार्या खासगी बस व एसटी महामंडळाच्या बसचा वाळुंज बायपास चौक (ता. अहिल्यानगर) येथे अपघात झाला. या अपघातात आठ ते नऊ जण जखमी झाले असून दोन महिलांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. ही घटना रविवारी (26 एप्रिल) सायंकाळी घडली.
खासगी बस चिंचोडी पाटील येथील लग्नाचे वर्हाड घेऊन गावाकडे येत होती. त्याचवेळी अहिल्यानगरहून श्रीगोंदा येथे जाणारी एसटी महामंडळाची बस वाळुंज शिवारातील पुलाखाली येत असताना दोन्ही बसची धडक झाली. धडकेचा जोर इतका होता की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात बसमधील आठ ते नऊ प्रवासी जखमी झाले. काही जण किरकोळ जखमी झाले असले तरी अफरिन सरफराज मनियार व तस्लीम फारूक मनियार (रा. चिंचोडी पाटील, ता. अहिल्यानगर) या दोन महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बाबासाहेब गुंजाळ, मंगेश खरमाळे, आदिनाथ शिरसाठ आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.





