नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची बुधवारी (६ मे) रात्री कोलकात्याच्या बाह्य भागात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. उत्तर परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरातील डोहरिया परिसरात ही घटना घडली. दोन ते तीन दिवस रेकी करून, कट रचून चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आल्याचे आरोप सुवेंदू अधिकारी यांनी यावेळी केले आहेत.
नेमकी घटना काय घडली?
समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे आपल्या गाडीतून उत्तर २४ परगणामधील मध्यमग्रामच्या डोलतला परिसरातून रात्री सुमारे 10.30 वाजता घरी जात होते. काही हल्लेखोर हे दुचाकी आणि चारचाकीमधून आले आणि त्यांनी चंद्रनाथ रथ यांची गाडी जबरदस्तीने थांबवली. यानंतर, चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या रथ यांच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून अंदाधुंद गोळीबार केला. दरवाजाच्या काचेतून गोळ्या रथ आणि त्याच्या चालकाला लागल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रथ यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटामध्ये गोळ्या लागल्या. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिली माहिती
राज्याचे पोलीस महासंचालक सिद्धनाथ गुप्ता यांनी सांगितले की, “आम्ही तपास सुरू केला असून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.”
पडसाद : रक्तपेढीच्या उद्घाटनाला मुहूर्त कधी?
चंद्रनाथ कर यांच्या कारचा पाठलाग दोन वाहनांकडून सुरू होता. त्यात एक कार आणि एका दुचाकीचा समावेश होता. या कारने काही वेळाने चंद्रनाथ कर यांच्या कारला ओव्हरटेक केलं. त्यामुळे चंद्रनाथ कर यांच्या चालकाला कारचा वेग कमी करावा लागला.त्यानंतर काही क्षणांतच दुचाकीवरील हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. यातील तीन गोळ्या चंद्रनाथ कर यांच्या छाती, पोट आणि डोक्यात लागल्या. दरम्यान, भाजपा नेते सुकांता मजुमदार यांनी चंद्रनाथ कर यांच्या छातीतून पाच गोळ्या काढल्या अशी माहिती दिली.
हा 15 वर्षाच्या महा-जंगलराजचा परिणाम आहे-सुवेंदू अधिकारी
“हल्ला करण्याआधी मारेकऱ्यांनी परिसराची रेकी केली होती. अत्यंत निर्दयीपणे करण्यात आलेली ही हत्या आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला असून आम्ही दु:खात आहोत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. दिल्लीतील आमच्या नेतृत्वाने या घटनेची सगळी माहिती घेतली आहे. पोलिसांना काही पुरावे मिळाले असून ते तपास करतील. हा 15 वर्षाच्या महा-जंगलराजचा परिणाम आहे. भाजप ही गुंडगिरी संपवण्याचे काम सुरु करेल. फक्त जरा वाट पाहा,” असेही ते पुढे म्हणाले.
न्यायालयाच्या देखरेखेखाली सीबीआय चौकशी केली जावी
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचे आरोप यावेळी करण्यात आला. यानंतर पक्षाने निवेदन जारी करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही मध्यमग्राममधील चंद्रनाथ रथ यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करतो. आम्ही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करतो, ज्यात न्यायालयाच्या देखरेखेखाली सीबीआय चौकशी केली जावी. इतर भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्यांचीही चौकशी केली जावी.”





