जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जिल्ह्यात इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सुरु करण्यासाठी यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी नियोजन करण्यात आले होते.
मात्र, जिल्हधिकारी अभिजीत राऊत यांनी शिक्षकांची आरटीपीसीआर, अँटीजेन चाचणी अहवाल महत्वाचा आहे, अशी अट टाकल्याने वेळेत चाचण्या पूर्ण झाल्या नाही.
तसेच काही शिक्षक करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शाळा सुरु करण्याचे नियोजन बारगळले होते.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या झालेल्या आरटीपीसीआर, अँटीजेन चाचणीमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील 24 शिक्षक व 14 शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 38 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागला प्राप्त झाली आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन झाले होते.
या निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना दिल्या असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचार्यांच्या आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असून तसा अहवाल मिळाल्यानंतर शिक्षकांना वर्गात प्रवेश राहील. त्या आदेशानंतर शिक्षकांच्या चाचण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत.
तर काही शिक्षकांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 7 डिसेंबरपर्यंत शाळा सुरु करण्याचे नियोजन पुढे ढकलण्यात आले होते.
दरम्यान,त्यादृष्टीने प्रत्येक ठिकाणी तालुकानिहाय कोरोना तपासणी करण्याची सुविधा आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती.
जिल्ह्यातील 13 हजारांच्यावर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची आरटीपीसीआर चाचणी आणि अँटीजेन चाचणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरले होते.
आतापर्यंत झालेल्या चाचणीत जिल्ह्यातील 38 शिक्षक व कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले.