मुंबई
१० ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान मिळावे, राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना देण्यात आलेल्या आश्वासन सरकारने पूर्ण करावे, शाळांना 20 टक्के टप्प्याटप्याने अनुदान यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं होते . आपल्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक होताच सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे . या बाबत आज शिक्षकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत शिष्टमंडळाच्या बैठकी नंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन घोषणा केली की, ‘विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होईल, इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही.’ थोड्या आर्थिक अडचणींमुळे मधल्या काही काळातील हफ्ते देण्यास उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेऊ नका, तुमचे काम आम्हीच करणार आहोत. पुरवणी मागण्यांमधे आज मांडता आले नाही, मात्र इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही. इथून पुढे हा पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल.18 तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल. त्यावेळी तुमच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल.’ असे गिरीश महाजन यांनी सांगितले




