अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील शिक्षक पदोन्नतीचा अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) निकाल जाहीर झाल्यानंतर आणि शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने पदोन्नती प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्र प्रमुख पदाची पदोन्नती करण्यात येणार असून, त्यानंतर संच मान्यता अंतिम होताच उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्गही मोकळा होणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी तसेच पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले होते. या अटीमुळे राज्यभरात शिक्षक पदोन्नती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आणि अटी-शर्तींच्या अधीन राहून पदोन्नतीस परवानगी देण्यात आली आहे.
केव्हा व कुठे अंमलबजावणी ?
शासनाच्या नव्या पत्रानुसार, न्यायालयीन निर्णयानंतर दोन वर्षांची सवलत देण्यात येणार नाही. म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार नाही. ही अट राज्यभर लागू करण्यात आली असून, संबंधित जिल्हा शिक्षण विभागाकडून प्रक्रिया सुरू होणार आहे.
का अडचणी निर्माण झाल्या होत्या ?
अवर सचिव शरद माकणे यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केल्याप्रमाणे, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देता येणार नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांची पदोन्नती रखडली होती.
कशी होणार पदोन्नती ?
केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी पदोन्नतीसाठी संच मान्यतेची अडचण नाही. केंद्र प्रमुख पदासाठी पदवीधर शिक्षक म्हणून किमान सहा वर्षांची सेवा ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र, पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा पहिली की दोन्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, याबाबत शिक्षकांमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांनी पदोन्नती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, नियमबद्ध आणि कोणावरही अन्याय न होईल अशा पद्धतीने राबवावी, अशी ठाम मागणी शासनाकडे केली आहे.




