नाशिक | प्रतिनिधी
टाके देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बरड्याची वाडीजवळील पाड्यावर राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने चार मुलांची विक्री केल्याच्या खळबळजनक आरोपानंतर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी स्थापन केलेल्या बालकल्याण समितीने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून सदर ‘दत्तक’ प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. ४५ वर्षीय महिलेने १४ मुला-मुलींना जन्म देत त्यातील चार मुलांची विक्री केल्याचा दावा काही स्थानिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती.
दरम्यान, मुलांची विक्री केली नसून, त्यांना दत्तक दिल्याचा दावा महिलेने केला. त्यानंतर समितीने अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना सादर केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, तसेच बालकल्याण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, चौकशी अहवाल पोलिसांना सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या समितीने सखोल चौकशी करून अहवाल ग्रामीण पोलिसांना सुपूर्द केला आहे. अहवालात, तीन बालकांची दत्तक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवण्यात आल्याचे म्हटले आहे. ‘मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा’ याप्रमाणे दत्तक प्रक्रिया राबविली गेली नसल्याने प्रकरणाचा आणखी सखोल तपास करावा, असे अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, अहवाल प्राप्त होताच, पोलिसांनी तपासासह चौकशी सुरू केली आहे. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीनही बालकांना बालगृहामध्ये दाखल केले आहे. तर बालकांना दत्तक घेणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
सखोल कार्यवाही सुरू
बालकल्याण समितीच्या अहवालानुसार सखोल तपासाबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत. तशी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




