Friday, May 3, 2024
HomeUncategorizedकोरोनाने वाढवली औरंगाबादकरांची चिंता

कोरोनाने वाढवली औरंगाबादकरांची चिंता

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात (corona) कोरोनाची चौथी लाट हळूहळू संसर्गाचा विळखा अधिकाधिक घट्ट करण्याची चिन्हे दिसत आहेत. औरंगाबाद शहरात मागील आठवडाभरापासून रोजच्या नवीन (Patient) रुग्णवाढीचा आलेख वाढत चालला आहे. दरम्यान, रविवारी तब्बल ४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) निघाले. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १६३ झाली आहे. विशेष म्हणजे, रविवारी शहराचा पॉझिटिव्हीटी रेट १७.७५ टक्के एवढा नोंदला गेला.

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या रविवारी १७१ वर पोहचली असून आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी जूनअखेरनंतर कोरोनाची चौथी लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरोग्य तज्ज्ञांचा हा अंदाज आता सत्यात उतरताना दिसत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज वाढ होत चालली आहे.

विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक गतीने पसरू लागला आहे. आजघडीला शहराच्या प्रत्येक भागातून कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे हे चक्र खंडीत न झाल्यास अवघ्या काही दिवसांतच रुग्णवाढीचा वेग आणखी वाढण्याची शक्‍यता महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. शहरात रविवारी प्राप्त झालेल्या चाचण्यांच्या अहवालातून ४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात २४ पुरुष तर १७ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. प्राप्त अहवालानुसार रविवारी १८ ते ५० वयोगटातील ३० जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तरुण मंडळी विविध कामांसाठी घराबाहेर पडत असून या ना त्या कारणाने ती बाधितांच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे याही वेळी तरुणांतून अधिक बाधित आढळून येत आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णांत एका पाच वर्षांच्या आतील मुलाचाही समावेश आहे. तर ६ ते १८ वर्षे वयोगटातील एका मुलाचा समावेश आहे. तर ५० वर्षांवरील ९ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष

शहरात संसर्ग वाढत असताना कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे मात्र पालन होताना दिसत नाही. मास्क वापरणे बंधनकारक नसले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरायला हवा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. नागरिकांनी सॅनिटायझरचाही वापर करणे गरजेचे आहे. मात्र या सर्व नियमांना फाटा दिला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांचा हा निष्काळजीपणा रुग्णवाढीचा वेग वाढल्यास कडक निर्बंध लागू करण्यास भाग पाडू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या