Tuesday, October 22, 2024
Homeनगरकळस खुर्द येथे आदिवासी समाजावर मोठे संकट

कळस खुर्द येथे आदिवासी समाजावर मोठे संकट

निळवंडेच्या आवर्तनामुळे घरांसह शेतात शिरले पाणी

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतामध्ये आणि घरांमध्ये शिरले आहे. मात्र जलसंपदा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून संतप्त झालेल्या आदिवासी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकर्‍यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून आले असून शेतामध्ये उभे पीक पाण्यात बुडाले आहे. अनेक शेतकर्‍यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisement -

घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत. स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली नाही. काही घरांच्या भिंतींना चिरा गेल्या असून कधीही घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरातील सदस्य आता रात्री झोपताना देखील या भीतीने ग्रस्त आहेत, की कधी घर पडेल आणि ते मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले जातील. बाहेर झोपायचे तर पाऊस आहे. शौचालयाच्या टाक्या पाण्यामुळे भरल्या आहेत. बिबट्याच्या भीतीने शौचाला कसे जायचं, शेतात पण पाणी मग रात्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी समाजाच्या मरणयातना, लोकांचे जीवन आता एका कठीण परीक्षेत आले आहे. आम्ही मरण यातना भोगत आहोत, असे स्थानिकांनी भावनिक आवाहन केले आहे.

पाण्यामुळे होणार्‍या त्रासामुळे त्यांची जगण्याची आशा हरवत आहे. सरकारने आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचे जीवन आणखी बिकट होईल. त्यामुळे जलसंपदा विभागाने व स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केले नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे संकट ओढावले आहे. आता प्रशासनाकडून तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा लक्ष्मण तेलम, गुलाब तेलम, चंद्रकला तेलम, प्रशांत तेलम, अनिता डोके, भाऊसाहेब डोके, केरू डोके, उल्हास तेलम, राघू तेलम, राहुल तेलम, नवनाथ डोके, अजित कडाळे, सचिन तेलम, बाळू तेलम, बाळासाहेब डोके, प्रकाश गिर्‍हे, रामनाथ गिर्‍हे, योगेश मेंगाळ, विठ्ठल गिर्‍हे, ठामा गिर्‍हे, जनाबाई आगिवले, साहेबराव आगिवले, सुखदेव पथवे, मधुकर पथवे, विलास पथवे, शिवाजी मेंगाळ आदींनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या