संगमनेर | Sangamner
देशातील चौदा ते अठरा वयोगटातील सुमारे दोन कोटी विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर असल्याची बाब केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. त्यामागे विविध कारणे असली तरी माध्यमिक स्तरावर कौशल्याधारित शिक्षणाचा अभाव हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे मतही नोंदवण्यात आले आहे. त्याचबरोबर दारिद्—य हे देखील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची आर्थिक परीस्थिती सुधारल्याशिवाय शाळाबाह्य प्रश्नावर मात करण्यात आपल्याला यश मिळू शकणार नाही.
केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात शिक्षणासंदर्भात टाकलेल्या प्रकाश झोतात त्यांनी म्हटले आहे, की साधारण 44 टक्के विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीच्या अभावी शिक्षणाला रामराम करत आहेत. त्यातील साधारण 67.32 टक्के विद्यार्थी हे मुले आहेत. त्याचवेळी मुलींच्या शिक्षणाचा अडथळा ठरताना घरची कामे, त्यासंदर्भातील जबाबदारी ही कारणे आहेत.साधारण शाळा सोडलेल्या एकूण मुलींपैकी पंच्चावन्न टक्के मुली केवळ घरची जबाबदारी म्हणून शाळांकडे दुर्लक्ष करतात. साधारण 8 टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज वाटत नाही. घरगुती कामात सहकार्य करण्यासाठी साधारण 28 टक्के विद्यार्थी शाळाबाह्य राहतात. शाळा अंतरावर आहे म्हणून एक टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाही, तर घरच्यांच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी साधारण 44 टक्के विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. 19 टक्के विद्यार्थी इतर कारणांनी शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडलेले नसल्याचे चित्र समोर आले आहे.
एकूण विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून दूर जाण्याची जी विविध कारणे समोर येता आहेत, त्यावर मात करायची असेल तर त्यासाठी विद्यालयाच्या अभ्यासक्रमातच व्यावसायिक, कौशल्याधारित शिक्षणाचा विचार करण्याची गरज आहे. कौशल्याधारित शिक्षणाचा विचार केला गेला तर शंभर टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकू शकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण अधिक कालसुंसगत आणि रोजगारभिमुख बनण्यास मदत होईल अशी अपेक्षा करण्यात आली आहे. असे घडले तर जीवनात जे शिक्षण घ्यायचे आहे, त्यासाठीचा प्राथमिक अनुभव देणारे ठिकाण म्हणून शाळांचे स्थान निर्माण होऊ शकते.
सध्या 2023-24 या वर्षाचा विचार करता चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील साधारण 0.97 टक्के विद्यार्थ्यांना शाळा किंवा संस्थांच्या रूपाने प्रशिक्षण मिळू शकले आहे. ही संख्या साधारण 11.33 लाख इतकी आहे. 92 टक्के विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाचे प्रशिक्षण मिळू शकलेले नाही ही संख्या साधारण 1 हजार 72.25 लाख इतकी आहे. त्याचवेळी साधारण 7.09 टक्के विद्यार्थ्यांना अनौपचारिक अथवा स्वंप्रशिक्षण स्वरूपात कौशल्य प्राप्त करत असतात. ही संख्या साधारण 82.64 लाख इतकी आहे. त्यामुळे कोणताही मान्यता प्राप्त रोजगार उपलब्धतेचा मार्ग नाही. वर्तमानात सेवा क्षेत्रात अर्ध्यापेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे.
वर्तमानात शिक्षण आणि कौशल्य रोजगार प्रशिक्षण यांचे नाते निर्माण केले तर शाळाबाह्यतेचे प्रमाण आपोआप कमी होण्यास मदत होणार आहे. देशातील सध्याच्या शिक्षणाच्या परिस्थितीचा विचार करता आयटी, आयटीआएस क्षेत्रात साधारण 52.94 टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वस्त्र आणि हस्तकलेच्या क्षेत्रात 11.32 टक्के, कार्यालय, व्यवसाय संबंधीच्या क्षेत्रात 8.65 टक्के, सौंदर्य आणि स्वास्थ क्षेत्रात 2.67 टक्के, विद्युत शक्ती आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 2.58 टक्के, हस्तशिल्प, घरगुती उत्पादनाच्या क्षेत्रात 1.82 टक्के, आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान क्षेत्रात 0.96 टक्के व इतर क्षेत्रात 19.06 टक्के विद्यार्थ्यांनी औपचारिक प्रशिक्षणाचा मार्ग अनुसरला आहे.





