अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार, 12 ते 14 मे दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्याचा पारा वधारतांना दिसत आहे. सकाळी 9 पासून उन्हाचा चटका वाढत असून दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत उन्हाचा कडका जाणवत आहे. या काळात शहरासह ग्रामीण भागात शुकशुकाट जाणवत आहे. दुसरीकडे दररोज तापमानात वाढ होतांना दिसत आहे. त्यात आता भारतीय हवामान विभागाने नगरसह राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेचा यलो अर्लट जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यात मंगळवार ते गुरूवार (दि.14) पर्यंत उष्मालाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या लाटेतील दोन दिवस अजून शिल्लक असून यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




