Saturday, July 25, 2026
HomeनगरNewasa : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

Newasa : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथील घटना

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे सोमवारी नदीच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे भालगाव परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये भास्कर देवराव तनपुरे (वय 50) आणि सार्थक गणेश निमसे (वय 16, इयत्ता दहावी) यांचा समावेश आहे. दोघांनाही धार्मिक कार्याची विशेष आवड होती. जुने भालगाव येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात दर सोमवारी कीर्तन व भंडार्‍याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सोमवारी झालेल्या भंडार्‍याच्या तयारीत व स्वयंपाकाच्या कामात दोघांनीही उत्साहाने सहभाग घेतला होता.

- Advertisement -

दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास दोघे नदीत पोहण्यासाठी गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. मात्र कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी थांबले असावेत, असा समज झाल्याने रात्रीपर्यंत त्यांच्या अनुपस्थितीकडे विशेष लक्ष गेले नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजता नदीकाठी मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांना नदीकाठावर कपडे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता नदीपात्रात दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. अंदाजे 16 ते 18 तासांनंतर हे मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच शिवशंभो अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसचे चालक अनिल मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे हलविले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन नेवासा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. भास्कर तनपुरे हे स्थानिक शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. तर सार्थक निमसे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी आहेत. सार्थकच्या अकाली निधनाने गावकर्‍यांसह शालेय मित्रपरिवारातही मोठी शोकभावना व्यक्त होत आहे. धार्मिक कार्यात सहभागी झाल्यानंतर काही तासांतच दोघांवर काळाने घाला घातल्याने जुने भालगाव गावावर दुःखाचे सावट पसरले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

सरकार

“मुलांच्या संघर्षासमोर सरकार झुकले…”, आंदोलनानंतर अभिजीतच्या आईची पहिली प्रतिक्रिया

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajinagarNEET पेपरफुटी प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या...