अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी (Pathardi), शेवगांव (Shevgav), जामखेड (Jamkhed) व अहिल्यानगर (Ahilyanagar) या तालुक्यांतील ओढे-नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने 227 व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका (Ahilyanagar Municipal Corporation) व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी येथील जामखेड-पाथर्डी बायपासवर (Jamkhed-Pathardi Bypass) पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील 70 जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता.
मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.




