दिल्ली । Delhi
“देशात सध्या लोकशाही उरलेली नसून प्रशासकीय क्रूरतेने परिसीमा गाठली आहे. सत्तेच्या मस्तीत अंध झालेल्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात हवा गेली असून, ही हवा उतरवण्यासाठी देशातील जनता जास्त वेळ लावणार नाही,” असा खरमरीत इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला दिला.
जंतरमंतरवर उपोषणाला बसलेले आंदोलक अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची काल उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली होती. या भेटीनंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नांची सरबत्ती करत जोरदार हल्ला चढवला. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून तरुणांच्या पाठीशी उभे आहोत. काल केवळ योगायोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आंदोलन केले. परंतु, केंद्र सरकार ज्या क्रूर पद्धतीने हे आंदोलन दडपून टाकत आहे, ते पाहता आज ‘यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते’ असे म्हणण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे.”
लोकशाहीत संवादाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्पष्ट केले की, देशातील तरुणांनी किंवा नागरिकांनी आंदोलन उभारल्यास त्यांच्याशी चर्चा करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य असते. “जर अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक यांच्याशी सरकारने पहिल्याच दिवशी सकारात्मक चर्चा केली असती, तर आज ही वेळ आली नसती,” असे ते म्हणाले. आपल्या मुद्द्याच्या समर्थनासाठी त्यांनी भूतकाळातील दाखले दिले. “पूर्वी जेव्हा वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. तसेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला होता. मात्र, सध्याचे सरकार केवळ जबरदस्तीने आपले निर्णय जनतेवर लादत आहे,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
काल जंतरमंतरवर घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध करत ठाकरे म्हणाले, “आंदोलनस्थळी ९ ते १० वर्षांच्या लहान मुली आणि महिलांशी पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीचे वर्तन केले, ते अत्यंत संतापजनक आहे. ही कोणतीही हिंदू संस्कृती असू शकत नाही; हे केवळ रावण राज्य सुरू आहे. सरकारसाठी एक व्यक्ती महत्त्वाची आहे की संपूर्ण जनता, याचा निर्णय आता झाला पाहिजे.” आंदोलकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत त्यांनी विचारले, “जर आंदोलक एखाद्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतील, तर त्यात गैर काय आहे? आज देशातील तरुणांना आधाराची गरज आहे. हा आधारच जर सरकार मोडून काढणार असेल, तर ही सरळसरळ हुकूमशाही आहे. जर सरकार स्वतःला लोकशाहीवादी मानत असेल, तर आंदोलन करणाऱ्या तरुणांशी संवाद साधायला त्यांना कसला कमीपणा वाटतो?” असा थेट सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.




