मुल्हेर | वार्ताहर Mulher
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. या अस्मानी संकटाने काढणीस तयार असलेले गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी पावसासोबत आलेल्या गारांच्या वर्षावाने कांदा पिकही बाधीत झाले. मुल्हेर, साल्हेर, बोरदैवत, हरणबारी, ताहाराबाद भागात वादळी वार्यासह जोरदार झालेल्या या पावसाने हातातोंडाशी आलेले आंबा पिकही हातचे जाण्याच्या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या आठवड्या भरापासून मोसमखोर्यासह हरणबारी, मुल्हेर या बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात उन्हाचा तडाखा वाढला होता. गेले दोन-तीन दिवस प्रखर ऊन सहन करत असतांनाच बुधवारी दुपारी वातावरणात अचानक बदल होत आकाशात पावसाळ्यासारखे ढग जमा झाले. हवेतला उष्मा वाढला असतांनाच अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांच्या काढणीच्या कामास व्यस्त असलेल्या शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. अचानक आलेल्या या पावसाने परिसरातील गहू पिक मोठ्या प्रमाणावर बाधीत झाले. काही ठिकाणी गव्हाची काढणी सुरू असतांनाच गारांच्या जोरदार मार्यामुळे काढून ठेवलेला गहूही भिजला. सलग अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या पावसाने वातावरणातील उष्मा कमी झाला असला तरी पावसाच्या या अचानक मार्याने हातातोंडाशी आलेले रब्बी पिकांच्या नुकसानीने बळीराजा पुरता हतबल झाला आहे.
गत खरीप हंगामाच्या अखेरीस पावसाने अशाच प्रकारे शेतकर्यांची दैना केली. खरीपात झालेल्या अवकाळी पावसाने खरीपाचे पिक पुर्णपणे वाया गेले. मका, बाजरी पिकालाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. खरीपातले झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल या मोठ्या आशेने शेतकर्यांनी झालेले नुकसान नजरेआड करीत मोठ्या उमेदीने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका तसेच उन्हाळी कांदा यांची लागवड केली. गेले दोन महिने जिवापाड सांभाळलेले हे पिक या पावसाच्या मार्याने पुर्णपणे बाधीत झाले. या पावसात भिजलेल्या गहू, हरभरा पिकाची प्रतवारी कमी होवून शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. वाढती मजुरी, महागडे रासायनिक खते, किटकनाशके वापरून जगवलेले हे पिक डोळ्यासमोर नेस्तनाबूत होतांना शेतकर्यांच्या डोळ्यात आसवे तरळल्याचे दिसून आले.
बागलाणसह अंतापूर, ताहाराबाद परिसरातही वादळी वारे व गारांच्या वर्षावात झालेल्या या पावसाच्या मार्याने कांदा पिकाची मोठी हानी झाली. या भागात उन्हाळ कांदा पिकाचे क्षेत्र मोठे आहे. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा पातीवर याचा परिणाम होवून कांद्याची प्रतवारी घसरण्याचीही भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हरणबारी, मुल्हेर, जायखेडा, अंतापूर, ताहाराबाद या परिसरात आंबा पिकाचेही प्रमाण अधिक आहे. अनेक शेतकर्यांनी पुर्वापार असलेली जुनी आंब्याची झाडे जोपासून नव्याने आंब्याची लागवड केली आहे. मात्र या जोरदार वारे आणि गारांचा मारा यामुळे बाजारात गुढीपाडवा व अक्षयतृत्तीयेच्या मुहूर्तावर येणार्या आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. मालेगाव तालुक्याच्या काटवन भागातही दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या वातावरणातील सातत्याने होणार्या बदलाने रब्बी पिकांची मोठी हानी होण्याचीशंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.




