Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशवंदे भारत मिशन : आतापर्यंत 6037 भारतीय परतले मायदेशी

वंदे भारत मिशन : आतापर्यंत 6037 भारतीय परतले मायदेशी

सार्वमत

नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध देशांत अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने वंदे भारत मिशन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 7 मे 2020 पासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने आतापर्यंत 6037 भारतीयांना मायदेशात परत आणलेे, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने सांगितले.

- Advertisement -

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात अडकलेल्या 14,800 भारतीयांना पहिल्या टप्प्यात परत आणले जाईल. वंदे भारत मिशनमुळे अनेक नेत्यांनी भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या परतीसाठी सात मेपासून सुरु करण्यात आलेली विशेष विमान उड्डाणे टप्प्या-टप्प्याने चालूच राहतील. ही उड्डाणे 31 मे पर्यंत चालूच राहण्याची शक्यता आहे, असे सरकारने म्हटले आहे.

दरम्यान करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे विमान प्रवासी वाहतुकीवर निर्बंध टाकण्यात आले होते. अमेरिका तसेच इतर देशात मोठ्या संख्येने अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांची संख्या पाहता येत्या आठवड्यात विमानांची संख्या वाढवली जाऊ शकते. अमेरिकेत भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतांनी मायदेशी परतण्याच्या विचारात असलेल्या भारतीयांच्या याद्या तयार करण्यास सुरवात केली. ऑनलाईन नोंदणीद्वारे या याद्या तयार केल्या जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या