नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये (Executive of Maharashtra Mahila Pradesh Congress)नाशिक महिला काँग्रेस शहराध्यक्षा तथा नगरसेविका वत्सला खैरे (Vatsala Khaire)यांची कार्यकारी सदस्य तर त्यांच्या कन्या स्वाती जाधव (खैरे) यांची थेट ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे काही वर्षांपासून रिक्त असलेल्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदाला न्याय मिळाला आहे.
उदयपुर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पक्षात नवचैतन्य फुंकण्यासाठी वीस ठराव संमत करण्यात आले होते. त्यात ‘ एक व्यक्ती एक पद ‘ व घराणेशाहिला आळा घालणे ‘ हे ठराव चर्चेचे विषय ठरले होते. मात्र,त्यास पंधरवडा लोटत नाही तोच या चर्चा नुसत्या ‘गप्पा’ ठरल्याचे या निवडीवरून सिध्द झाले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रिय महिला अध्यक्षा डिसुजा यांनी जाहीर केलेली महाराष्ट्र प्रदेश महिला कार्यकारणी त्यास निमित्त ठरली आहे. कार्यकारणीत नाशिकमधील खैरे परिवारावर विशेष मेहरबानी दिसून येत आहे. वत्सला खैरे या नगरसेविका व मागील १३ वर्षांपासून महिला शहराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
आता त्यांचा प्रदेश महिला कार्यकारणीत कार्यकारी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे एकूण तीन पदांची जबाबदारी आहे. ममता पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्षपद मागील दीड ते दोन वर्षांपासुन रिक्त होते. या जागी वत्सला खैरे यांची कन्या स्वाती जाधव (खैरे) यांची नियुक्ती करत त्यांना ग्रामीण अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. वत्सला खैरे यांचा मुलगा बबलू खैरे देखील मागील काही वर्षांपासून काॅग्रेस मध्य नाशिक ब्लाॅक अध्यक्ष आहे.
पद सोडण्यास तयार
ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपद मिळावे,अशी मागणी पक्षाकडे आम्ही केलेली नव्हती.ग्रामीण भागातील महिलेलाच या पदावर संधी मिळावी,अशी आमची भूमिका आहे. पक्षाने ही जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने आदेश दिल्यास आम्ही हे पद सोडण्यास तयार आहोत.
– बबलू खैरे,काँग्रेस मध्य नाशिक ब्लाॅक अध्यक्ष