अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पशुसंवर्धन विभागाच्या 1962 टोल फ्री क्रमांक व मोबाईल वेटरनरी क्लिनीकमधील तांत्रिक समन्वयामुळे राज्यातील पशुपालकांना त्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होत असून, वर्षभरात प्राप्त 4 लाख 1 हजार 992 कॉल्सपैकी 3 लाख 78 हजार 35 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
या सेवेमुळे दुर्गम भागातील 34 हजार 979 पशुपालकांना थेट लाभ मिळाला असून अद्ययावत तंत्रज्ञान व फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नियोजनामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत आहेत. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार असल्याने त्यांच्या आरोग्याचे संरक्षण महत्त्वाचे ठरत आहे. आणीबाणीच्या प्रसंगी उपचारासाठी लागणार्या ‘गोल्डन अवर’चा प्रभावी उपयोग या सेवेमुळे होत असून कॉल केल्यानंतर सुमारे दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचत आहे. त्यामुळे वर्षभरात 29 हजार 130 मोठे व 35 हजार 569 लहान अशा एकूण 64 हजार 759 पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
1962 हेल्पलाइनव्दारे तातडीचे औषधोपचार, लहान व मोठ्या शस्त्रक्रिया, शास्त्रीय पध्दतीने खच्चीकरण, कृत्रिम रेतन, जंतनाशक उपाययोजना, लसीकरण व वंध्यत्व तपासणी यांसारख्या विविध सेवा पुरवल्या जात आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती, भाजणे व सर्पदंश अशा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद दिला जात आहे. पशुपालकांना पशुआरोग्य, आहार व्यवस्थापन व शासकीय योजनांची माहितीही उपलब्ध करून दिली जात आहे.





