संगमनेर (प्रतिनिधी)
संपूर्ण गाव एकवटले असताना आदिवासींचा निधी, विविध विकासकामांचा निधी नेमका कुठे गेला? असे अनेक प्रश्न विचारले असताना विखे समर्थक सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने मोठा राडा झाला.
जोर्वे येथे शुक्रवारी (दि.३०) ग्रामसभा होती, परंतु विशिष्ट कारणांनी सामान्य जनता आपला पैसा कर स्वरूपात सरकारला देत असते व त्यातीलच काही निधी सरकार ग्रामपंचायतीला गावच्या विकासासाठी देत असते, परंतु गेली अडीच वर्षे या निधीचा संपूर्णपणे गैरवापर होत असल्याने जाब विचारण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते. त्यावर सरपंचांकडे याचे उत्तरच नसल्याने सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारणाऱ्यांनाच दम देणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झाले. एकीकडे विकासकामांचा डोंगर उभा करत आहोत, परंतु त्याचवेळी जेव्हा एक एक करून अनेक घोटाळे बाहेर निघायला सुरुवात झाली, त्यावेळेस मात्र ते हमरीतुमरीवर आले असल्याचा आरोप होत आहे.
ग्रामसेवकांनाही जे काही प्रश्न विचारण्यात आले त्याचे उत्तरही त्यांना देता येत नव्हते. गावात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सर्वच सदस्यांना धारेवर धरले. तर उपसरपंच व सदस्यांनीही त्यांची हतबलता बोलून दाखवत ग्रामपंचायतीत कोणत्या गोष्टी खरेदी केल्या जातात व कोणाला दिल्या जातात हे आम्हांलाच कळत नाही, कोणता निधी कुठे वापरला जातो हेही कळू दिले जात नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आलेला निधीही परस्पर दुसरीकडे वळवला जातो, वेगळ्याच माणसाच्या नावाने खाते काढून त्यावर निधी वर्ग काढून तोही पैसा लंपास केला जातो, छोट्या-छोट्या कामांचे मोठमोठी बिले काढतात असे आरोप ऐकून जनता अवाक झाली. सुरेश थोरात, सत्यजीत थोरात, हर्षल काकड, उपसरपंच बादशहा बोरकर, संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर, भाऊसाहेब दिघे, बालम भवर आदिंनी प्रश्नांचा भडीमार केला.