पुणे | Pune
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील (Murder Case) संशयित आरोपी आणि बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड अखेर २२ दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. त्यानंतर वाल्मिक कराड यांची खंडणी प्रकरणात सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.
आज वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात (CID Office) शरण येणार असल्याने सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच शरण येण्याआधी वाल्मिक कराडने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्याने म्हटले होते की, “मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे”, असे ते म्हणाले.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक (Accused Arrested) करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे संशयित आरोपी म्हणून नाव होते, तर खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. अखेर कराड २२ दिवसानंतर सीआयडीला स्वता:हून शरण आले आहेत.