कोलकाता । Kolkata
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन अखेर सुरू झाले आहे. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या तासाभरातच निकालात मोठे ‘ट्विस्ट’ पाहायला मिळत आहेत. एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष कल यामध्ये सध्या काटाजोड लढत सुरू असून, भारतीय जनता पक्षाने सुरुवातीच्या टप्प्यात तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड देत मोठी मुसंडी मारली आहे.
सकाळी ९ वाजेपर्यंत हाती आलेल्या अधिकृत कलानुसार, २९४ जागांच्या विधानसभेत भाजपने ८५ जागांवर आघाडी मिळवली आहे, तर सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) ८२ जागांवर आपले वर्चस्व राखले आहे. काँग्रेस केवळ २ जागांवर आघाडीवर असून इतरांच्या खात्यात अद्याप म्हणावी तशी प्रगती दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक असलेला १४८ हा ‘जादूई आकडा’ कोण गाठणार, यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये यंदा २३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यात अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. विशेष म्हणजे, यंदा मतदानाची टक्केवारी तब्बल ९२ टक्क्यांच्या आसपास राहिली आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा तो सत्तापालटाचा संकेत मानला जातो. याच शक्यतेमुळे ममता बॅनर्जी यांची सलग चौथी टर्म येणार की बंगालमध्ये पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे मतमोजणी शांततेत सुरू असतानाच दुसरीकडे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बिधाननगर येथे काल रात्री तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मतमोजणी केंद्राबाहेरील स्ट्रॉंग रूमसमोर भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्रीय सुरक्षा दलांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि लाठीमार करत जमावाला पांगवले. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
बहुतेक जनमत चाचण्यांनी भाजपला अनुकूल कौल दिला असला तरी, ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष २०० हून अधिक जागा जिंकून दिमाखात पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत बंगालच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.





