मुंबई | Mumbai
अयोध्या राम मंदिरातील दानातील चोरी प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. एसआयटीचा प्राथमिक तपास अहवाल मिळाल्यानंतर, रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गुन्हा दाखल केल्यानंतर, आठ जणांना आरोपी बनवण्यात आलेय. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी एसआयटीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे ही तक्रार केलीय. दुसरीकडे याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाना साधत काही गंभीर आरोप केले आहे.
संजय राऊतांचा खळबळजन दावा
‘अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने दान केलेली ४ किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत १ कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे!’ असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राऊत यांनी पोस्टमध्ये प्रश्न उपस्थित करत, “ती 4 किलो चांदीची वीट नेमकी कुठे गेली? तिचा हिशोब कुठे आहे? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे.
संजय राऊत यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. राम मंदिरासाठी देण्यात आलेल्या देणग्यांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आठ जणांवर गुन्हा दाखल
राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य श्रीकृष्ण मोहन यांच्या तक्रारीच्या आधारे, राम मंदिरातील दानाच्या चोरीप्रकरणी टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, सुभाष चंद्र शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव आणि रामशंकर मिश्रा यांच्या विरोधात नावे नमूद करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ३१६, ३१७, ३१७(४), ३१७(५), ६१, ३(५) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीसी कायदा) आरोप ठेवण्यात आले आहेत.
हे आरोप सार्वजनिक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली आणि विरोधी पक्षांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सोशल मीडियाद्वारे या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि पारदर्शकता निश्चित करण्यावर भर दिला.
दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतल असून चौकशीचे आदेश दिले. १३ जून रोजी, त्यांनी लखनौचे विभागीय आयुक्त डॉ. विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आणि त्याला मुदतीत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.




