मुंबई | Mumbai
नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ‘ते’ बडे नेते कोण? असा रोखठोक सवाल करत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. फक्त चाकणकर नव्हे, इतरही अनेक मंत्री, आमदार खरातकडे जायचे, त्यांची नावे फडणवीसांनी जाहीर करावीत अशी मागणी राऊतांनी केली.
ज्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचे नाव आले ते अत्यंत गंभीर आहे, लाजिरवाणे आहे, राज्याला कलंकित करणारे आहे. पण एकट्या चाकणकरचे आहेत का, तर तसे नाही. त्यामध्ये राज्यातले, देशातले अनेक महत्वाचे नेते आहेत. स्वत: दीपक केसरकर म्हणतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता आहात, खरातकडे ४० आमदार जात होते, हे ४० आमदार कोण हे पुढे आले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. खरातसाठी विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
खरात दिल्लीत कोणाला भेटत होता हे निष्पन्न झाले पाहिजे
संजय राऊत म्हणाले की, खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होत हे जर पोलिस तपासात निष्पन्न झाले असेल तर ते समोर आले पाहिजे. खरातचा वावर कुठे नव्हता ? सर्वत्र होता, बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा, असा त्याचा वावर होता, जणू काही सरकारने त्याला राजमान्यताच दिली होती असा टोला राऊतांनी हाणला. ती राजमान्यता देणारे लोकं आजही फडणवीसांच्या मंत्रीमंडळामध्ये आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावं असंही राऊत म्हणाले.
त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्या
ज्यांनी त्यांना राजमान्यता दिली ती लोकं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आजही आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावे. एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री जर वेगळी व्यवस्था करत असतील तर त्यावर आम्ही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीयांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्यावी. विरोधी पक्षनेता नेमावा तरच टीम महाराष्ट्र तयार होईल, असंही राऊत यावेळी बोलताना म्हणालेत.
लॉकडाऊन लागणार नाही ती चांगली गोष्ट आहे
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री जर सांगत असतील लॉकडाऊन लागणार नाही तर ती चांगली गोष्ट आहे, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम इंडियामध्ये कोण आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. का केवळ मोदी आणि अमित शहाच त्यामध्ये आहेत. जर महाराष्ट्रात टीम करायची असेल तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे. इराणमधील जनतेसाठी देशभरातील लोकांनी पैसे जमा करत त्यांना 500 कोटीची मदत केली आहे. सरकारने मदत केलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपने काहीही केले तरीही तिथे ममता बॅनर्जीच जिंकणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.





