सटाणा | प्रतिनिधी
शिवकालीन साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात नवचैतन्य पसरले असून शनिवारी(दि.12) आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली किल्ला परिसरातील मातीला वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती कपाळी लावून जल्लोष साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
बागलाण तालुक्यातील साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचा किल्ला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनीत झालेला आहे. साल्हेरच्या लढाईचे जागतिक युद्धाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असून, युनेस्कोने भारतातील किल्ल्यांचा वारसा स्थळांमध्ये समावेश करताना त्यात साल्हेरचाही समावेश करण्यात आला आहे.यामुळे किल्ला परिसरासह संपूर्ण तालुक्यातील पर्यटनाला नवी चालना मिळणार असून विकासाचे दालन खुले होणार आहे.यामुळे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी किल्ल्यावर जाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.बँड पथक, वाद्यवृंदाच्या ठेक्यावर गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण करीत भगवे ध्वज फडकवीत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार बोरसे यांनी युनेस्कोसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे विशेष ऋण व्यक्त केले. निवडणूक काळात साल्हेर परिसरात शिवसृष्टी उभारण्याचे आश्वासन दिले असून, त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली आहे.शिवसृष्टी व इतर पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित करण्यात आलेला पूर्ण आराखडा प्रत्यक्षात साकार होणार आहे. त्याच सोबत सद्यस्थितीत साल्हेरचा थेट जागतिक वारसा म्हणून समावेश झाल्याने या संपूर्ण परिसराचा कायापालट घडून येणार आहे असे आमदार बोरसे यांनी सांगितले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण पवार, शरद भामरे,सटाणा शहराध्यक्ष काकाजी सोनवणे,नामपूर बाजार समिती माजी सभापती भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब भामरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीप बच्छाव, भाजप तालुका उपाध्यक्ष मेघदीप सावंत,दीपक कांकरिया, युवक तालुकाध्यक्ष वैभव नंदन,लखन पवार,योगेश सूर्यवंशी,किरण सावंत,अभिमन देवरे, वीरेंद्र पगार,मनिद्र सावंत,गणेश खरोटे, मधुकर भोये,सचिन सोनवणे,संतोष जाधव, मोहन खैरनार आदींसह तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी,हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व इतिहासप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचे नवे दालन..
साल्हेरचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याने या दुर्गम आदिवासी परिसरात पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.हे स्थळ आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे पुढे येणार असून शासन स्तरावरून सर्व आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देत या परिसराचा सर्वांगीण कायापालट करण्याचा मानस आहे. यामुळे या परिसराच्या विकासाचे नवीन दालनच खुले होणार आहे
-आमदार दिलीप बोरसे,बागलाण





