Thursday, July 23, 2026
HomeनगरRain Alert : जिल्ह्यात आज आणि उद्या यलो अलर्ट; शेतकरी, नागरिक धास्तावले,...

Rain Alert : जिल्ह्यात आज आणि उद्या यलो अलर्ट; शेतकरी, नागरिक धास्तावले, सतर्क राहण्याच्या सूचना

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १३ तारखेपासून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृष्य पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून ५९० घरांची पडझड, ८७३ घरात पुराचे पाणी शिरले, तर १८३ लहान-मोठी जनावरे वाहून गेली आहेत.

- Advertisement -

महसूल विभागाने प्रशासनाला सादर केलेल्या प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात प्रचंड दणका दिलेला असतानाच, आता हवामान विभागाने आज शनिवार (दि. २७) व उद्या रविवार (दि. २८) जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या इशा-यामुळे शेतकरी आणि नागरिक धास्तावले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसात मोठी विषमता दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमेनर, अकोले आणि राहुरी तालुक्यात पावसाची सरासरी आजही ८० टक्क्यांच्या आत असून त्यातही सर्वात कमी ६६.६ टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा पाथर्डी तालुक्यात १७१.७ टक्के, शेवगाव तालुक्यात १४७.२ टक्के झालेला आहे. उर्वरित तालुक्यात पावसाची सरासरी ही १०० टक्क्यांच्या पुढे आहे.

दरम्यान जिल्ह्यात १३ ते २६ सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, पूर तसेच तसेच वीज पडून पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात पाथर्डी तालुक्यातील सर्वाधिक ३, नगर व शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच अतिवृष्टीने जिल्ह्यातील ५९० घरांची पडझड झाली असून सर्वाधिक पडझड जामखेड तालुक्यात १६१ घरांची झाली आहे. तर नेवासा तालुक्यात १३४, कर्जत ६५, नगर ७, पारनेर १४, पाथर्डी ६८, राहुरी ४२, संगमनेर १०, शेवगाव ५९, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर १६ व राहाता तालुक्यातील १० घरांची पडझड झाल्याचे अहवालात दिसून येते.

शिवाय अतिवृष्टीने पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. यात मोठे दुधाळ ६८ व लहान ११५ जनावरे असे १८३ जनावरे दगावली आहेत. यात सर्वाधिक पाथर्डी तालुक्यात ११७, नगर तालुक्यात ५, जामखेड २८, कर्जत ८, नेवासा ८, पारनेर ५, राहुरी ३ व संगमनेर ९ जनावरांचा समावेश आहे. तसेच ३८ जनावरांचे गोठ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील ३६ तर पाथर्डी व राहुरी तालुक्यातील प्रत्येकी एका गोठ्याचा समावेश आहे. अतिवृष्टीने आलेल्या पुरात ८७३ घरांत पुराचे पाणी शिरले होते. यामध्ये सर्वाधिक जामखेड तालुक्यातील ४४० कुटुंबांना फटका बसला आहे. तसेच शेवगाव तालुक्यात १८५, पाथर्डी १६० आणि नेवासा तालुक्यातील ८८ घरांत पाणी शिरले होते.

ताज्या बातम्या

Thackeray Brothers News : NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला...

0
मुंबई | Mumbai नीट परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जंतरमंतरवर...