राहुरी l प्रतिनिधी
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पून्हा लाॅकडाऊन होणार या भीतीने…
राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात विष्णू गांगुर्डे या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (२२ फेब्रुवारी) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विष्णू बाबासाहेब गांगुर्डे वय ३० वर्षे राहणार गौतम नगर, रेल्वे स्टेशन, राहुरी. हा तरुण मोलमजूरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता. तसेच त्याने बचत गटातून कर्ज काढले होते. काही प्रमाणात मित्रांकडून हातउसने रूपये घेतले होते. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे व ऊसने घेतलेले रूपये परत कसे करायचे याची चिंता विष्णूला काही दिवसांपासून सतावत होती. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. अशी माहिती विष्णूच्या मित्रांकडून मिळाली.
आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळ अकरा वाजे दरम्यान विष्णू बाबासाहेब गांगुर्डे याने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या ॲगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना समजताच त्याच्या काही मित्रांनी त्याला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. विष्णूच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या निधनाने रेल्वे स्टेशन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने बाबत राहुरी पोलीसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस करत आहेत.