घारी |वार्ताहर| Ghari
झगडे फाटा ते पुणतांबा फाटा (Zagade Phata To Puntamba Phata) दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास हायवा आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन हायवा चालक गंभीर जखमी झाला. चांदेकसारे गावालगत समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) बोगद्याच्या ऐन तोंडाजवळ घडलेल्या या अपघातामुळे (Accident) परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालवाहू ट्रक एचआर 47 सी 2328 झगडे फाट्याच्या दिशेने जात होता. समोरून कोपरगावच्या (Kopargaon) दिशेने येणारा हायवा एमएच 15 जेडब्लू 6333 ची जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. नेमका बाजारचा दिवस असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. याच महामार्गावर अवघ्या दहा दिवसांपूर्वी दुचाकी अपघातात अश्विन खरात हा तरुण गंभीर जखमी (Injured) झाला होता, तर त्याच्यासोबतचा दुसरा तरुण कोमात गेला होता. मात्र त्या घटनेनंतरही संबंधित विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघातांची (Accident) मालिका थांबणार कधी? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. या मार्गावर सध्या परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेड्या बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने समोरून येणार्या वाहनांचा अंदाज लागत नाही. दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे, साईड पट्ट्या यांचा पूर्ण अभाव आहे. ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा निचरा करणारे चर बुजलेले, काही ठिकाणी नामशेष तर काही ठिकाणी अतिक्रमणामुळे अडथळलेले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) बोगद्याच्या तोंडाशी मोठमोठे खड्डे पडलेले असून बोगद्यातील विजेचे दिवे अनेक महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार आहे. या गंभीर बाबीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र अपघातप्रवण क्षेत्र झालेले आहे. रस्त्याची वेळेत देखभाल व दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अहिल्यानगर कार्यालयातील अधिकार्यांच्या निष्क्रियतेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दयनीयच का, असा सवाल उपस्थित होत आहे.
काही महिन्यापूर्वी या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी काही लाखांचे बिल अदा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे मात्र ठेकेदाराने कुठलीही देखभाल दुरुस्ती न करता बिल कसे मिळवले? कुणाच्या आशीर्वादाने सदर बिल अदा झाले? हे शोधणे महत्त्वाचे आहे. आता तरी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती, झाडांची छाटणी, योग्य दिशादर्शक फलक, रस्ते पट्ट्यांचे नूतनीकरण आणि बोगद्यातील प्रकाशव्यवस्था सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.





