
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
एसटी प्रवासासाठी शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्याने राज्यभरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुरेशा पूर्वतयारीशिवाय या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही सक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे.
सर्व्हर डाऊन, कार्डाचा तुटवडा आणि रिचार्जमधील त्रुटीमुळे राज्यभर गोंधळ उडाला आहे. हक्काची सवलत नाकारल्याने प्रवाशांना पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागत आहेत. महामंडळाने १४ आणि ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती सूट दिली असली तरी ती केवळ मलमपट्टी असून, या निर्णयामागील मूळ तांत्रिक त्रुटी दूर झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून हजारो कोटी रुपयांचे वितरण करताना लाभार्थी महिला आहे की नाही, याची प्रत्यक्ष तपासणी झालेली नाही. मात्र एसटीने सवलत घेताना प्रत्यक्ष बसने प्रवास करणाऱ्या महिलांकडून स्वतंत्र कार्डची मागणी करणे हे विसंगत आणि दुटप्पी धोरण असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
जिथे प्रत्यक्ष तपासणीची गरज आहे, तिथे तपासणी न करता अपात्र लाभार्थ्यांना हजारो कोटी रुपयांचा निधी वाटप केला जातो आणि जिथे महिला स्वतः प्रवास करत आहे, तिथे मात्र जाचक अटी लादल्या जात आहेत, ही बाब गंभीर असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.




