मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.
कोकणात १५ ते १७ एप्रिल दरम्यान, मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिल दरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान आणि विदर्भात १५ ते १९ एप्रिल दरम्यान काही ठिकाणी उष्ण तसेच दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी आणि ओआरएस घ्यावे. हलके आणि सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घेणे आणि घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विशेषतः जेष्ठ नागरिक आणि मुलांची काळजी घ्यावी. तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे. मद्यपान आणि कॅफिनयुक्त पेये टाळावीत तसेच उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.




