मुंबई | प्रतिनिधी Mumbai
झारखंडच्या ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे. अशा बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये आयपीएस अधिकारी दत्ता कराळे आणि दोन पोलीस अधीक्षक यांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. या रॅकेटला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस कॉलसेंटर आणि पैशांची हेराफेरी शक्यच नाही, असेही सपकाळ म्हणाले.
भोंदूबाबा अशोक खरातशी दत्ता कराळे यांचे संबंध असल्याचे व्हिडीओ नुकतेच प्रसार माध्यमांमध्ये दिसले. हे दत्ता कराळे तसेच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे या दोघांचाही बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटशी संबंध असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सीबीआयने ८ ऑगस्ट २०२५ आणि ११ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार नाशिक आणि इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली. सीबीआयला इगतपुरीत सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरची माहिती मिळाली आणि कारवाई झाली. पण बोगस कॉल सेंटरचा सुगावा महाराष्ट्र पोलीसांना का लागला नाही?असा सवाल सपकाळ यांनी यावेळी केला.
यापूर्वी कराळेंसह दोन्ही अधिकारी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते. तेव्हा हे कॉल सेंटर तिथे सुरु होते. पोलिसांनी या कॉलसेंटरवर छापा टाकला आणि नंतर संदीप सिंह, विशाल यादव या आरोपींना जुजबी कारवाई करून सोडून दिले. या तिन्ही अधिकाऱ्यांची नाशिक परिक्षेत्रात बदली झाल्यावर या आरोपींना हाताशी धरून कॉल सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष हे म्हणजे हे सर्व आरोपी ठाणे, रायगड आणि पालघर परिसरातील रहिवाशी आहेत. पूर्वी या तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिका-यांची पदस्थापना याच भागात होती आणि बोगस कॉलसेंटरही याच भागात सुरु होते, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले.
सीबीआय मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमित वसावा यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या एआयआरमधील नोंदीनुसार हे बोगस कॉल सेंटर सुरळीत चालू देण्यासाठी आरोपी गणेश कामनकर आणि त्याच्या भाऊ हे वरिष्ठ अधिकाऱ्याना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि क्रिप्टो करन्सीच्या रुपात लाभ देत होते. राज्य सरकारला याची संपूर्ण माहिती असतानाही या अधिका-यांवर अद्याप कारवाई का केली नाही ? असा प्रश्न करत सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.




