नवी दिल्ली | New Delhi
प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभाला (Mahakumbh) जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या रेल्वेस्थानकावरील (New Delhi Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर शनिवारी (दि.१५ फेब्रुवारी) रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास आली असता स्थानकावर गर्दी (Crowd) झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत
मृतांमध्ये ९ महिला, पाच लहान मुले आणि चार पुरुष प्रवाशांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.दिल्ली जीआरपी पोलिसांनी (GRP Police) सुरुवातीला प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाल्याचे नाकारले होते. मात्र, प्रवासी मोठ्या प्रमाणावर दगावल्याने रुग्णालयात अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती नाजूक असल्याने हा आकडा आणखी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Stampede) घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, दिल्लीचे उपराज्यपाल आणि अनेक विरोधी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींकडून दु:ख व्यक्त
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले आहे. “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल ऐकून खूप दुःख झाले,” असे राष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवर लिहिले आहे. तसेच मी पीडित कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करते”, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त
पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या कुटुंबियातील प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या सर्वांना यंत्रणांकडून योग्य ती मदत दिली जाईल”, असे त्यांनी म्हटले आहे.