पुणे | प्रतिनिधी Pune
पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील एका विवाहित तरुणीने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांतच आपले जीवन संपवले आहे. वैष्णवी जामकर (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून, तिने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाआहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे लग्न अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ सुखात गेल्यानंतर, सासरच्या मंडळींकडून किरकोळ कारणावरून तिचा छळ सुरू झाला. सासरच्या लोकांकडून तिच्यावर पैशांसाठी सातत्याने दबाव आणला जात होता आणि तिचा मानसिक छळ केला जात होता, असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या त्रासाला आणि पैशांच्या वाढत्या मागणीला कंटाळून अखेर वैष्णवीने हे टोकाचे पाऊल उचलले.
याप्रकरणी मृत वैष्णवीच्या कुटुंबीयांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पती, सासू आणि
सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
ही घटना घडल्यानंतर पुण्यात काही काळापूर्वी गाजलेल्या मुळशी येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, जिथे हुंड्यासाठी एका विवाहितेचा मृत्यू झाला होता.





