मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
प्रचंड मेघगर्जना, सोसाट्याचे वारे व सोबत आलेल्या वळीवाच्या पावसाने शहरवासियांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवून दिली. सुमारे तासभर सुरू असलेल्या या पावसाने तापमापकातील पारा खाली असला तरी उकाड्यात मात्र प्रचंड वाढ झाल्याने नागरीक हैराण झाले आहेत. या रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसाचे सातत्य टिकून राहिल्यास आगामी खरीप हंगामाच्या पुर्वतयारीसाठी शेतकर्यांना मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसापासून शहर-परिसरातील तापमान चाळीशीवर स्थिरावले होते. उन्हाच्या तीव्रतेने शहर परिसर भाजून निघत असल्याने जनसामान्यांसह शेतकरी या वळीवाच्या पावसाची वाट पाहत होते. आज दुपारी तीनच्या सुमारास आसमंतात अचानक काळे ढग दाटून आले. उकाड्याने शहरवासिय त्रस्त झाले असतांनाच पावसाला प्रारंभ झाला. ढगांचा गडगडाट व घोंगावणारे वारे यासह अचानक आलेल्या या पावसाने नागरीकांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. वादळीवार्यामुळे शहरातील काही ठिकाणचा वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
शहरालगत तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र हा पाऊस नव्हता. काही ठिकाणी किरकोळ सरी कोसळल्या. ग्रामीण भागात अद्यापही तापमान चाळीस अंशावर टिकून आहे. पावसाच्या या शिडकाव्याने शहरातील तापमान तीन अंशांनी उतरून ते ३७ अंशावर आले आहे. मान्सुनपुर्व झालेल्या या पावसाचे सातत्य टिकून राहिल्यास शेती मशागत काहीशी सुलभ होणार आहे. यावर्षीच्या विक्रमी तापमानाने शेतजमीनी कठीण झाल्या आहेत. प्रखर उन्हामुळे शेतीची कामे थंडावली होती. सध्या तालुक्यात ऊनसावलीचा खेळ सुरू असल्याने येत्या एक-दोन दिवसात जोरदार पाऊस अपेक्षित आहे.




