
नाशिक दि. २९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : Nashik
समाजातील सर्व प्रकारचे भेद विसरून मानवतेच्या कार्यासाठी समर्पित होणे हीच ईश्वराची खरी आराधना आहे, असा विचार सिंहस्थ महाकुंभ भक्तीसंगम चर्चासत्रात सहभागी वक्त्यांनी मांडला. संतांनी दिलेल्या सामाजिक ऐक्याचा संदेश अनुसरण्याची गरज असल्याचे सत्राचे अध्यक्ष स्वामी वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ठक्कर डोम येथे आयोजित सिंहस्थ महाकुंभमेळ्यानिमित्त ‘भारतीय संत आणि समरसता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे सत्र समन्वयक म्हणून पराग महाराज चातुर्मासे यांनी काम पाहिले.
या चर्चासत्रात शिवाजी महाराज मोरे, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप यांनी सहभाग घेऊन विविध विषयांवर विचार मांडले.
भारतीय संत परंपरेने समाजातील विविध भेद दूर करून ‘आपण सर्वजण एक आहोत’, असा समतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला आहे. संतांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात बंधुभाव, एकात्मता आणि समतेची भावना वृद्धिंगत करण्याची गरज आहे, असा विचार यावेळी मंडण्यात आला.
भारतीय संतांनी आपल्या अभंग, कीर्तन आणि आध्यात्मिक शिकवणीतून सामाजिक एकात्मतेचा विचार मांडला. समाजातील भेदभाव दूर करणे, सर्व घटकांना समानतेची वागणूक देणे आणि परस्परांमध्ये बंधुभाव निर्माण करणे, हाच सामाजिक समरसतेसाठीचा मूलभूत उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कुंभमेळा हा विविध संप्रदाय, परंपरा आणि विचारधारा यांना एकत्र आणणारा आध्यात्मिक व सांस्कृतिक सोहळा आहे. या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा आणि समरसतेचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचतो. दैनंदिन जीवनातही संतविचार आचरणात आणून समाजातील भेदभाव दूर करण्याचे आवाहन करण्यात आले.
संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वकल्याणाची भावना आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना ही सामाजिक समरसतेची प्रेरणा देणारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. समाजातील भेद हे दुःखाचे कारण ठरतात. त्यामुळे संतांच्या समतेच्या विचारातून प्रेरणा घेऊन सामाजिक सलोखा आणि एकात्मता मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले. यावेळी विविध वक्त्यांनी सामाजिक समरसतेच्या अनुषंगाने आपले विचार प्रभावीपणे मांडले. चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी माधवदास महाराज राठी यांनी समारोपीय मनोगत व्यक्त केले.




