
पुणे(प्रतिनिधी) Pune
पुण्याच्या मांजरी फार्म येथे बऱ्याच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्याने विद्यार्थ्यांनी आज उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत पुण्यात विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले आहे.
प्रलंबित मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. आदिवासी विकासमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर देखील सकारात्मक निर्णय झाला नाही. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालत विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मुंबईत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत शनिवारी बैठक झाली. बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्या. यानंतर शनिवारी रात्री विद्यार्थ्यांनी आदिवासी मंत्र्यांसोबत उपोषणस्थळी येऊन उपोषण मागे घेतले.
सरकारी आदिवासी वसतिगृहांतील प्रवेशासाठी ३० वर्षांची वयोमर्यादा निश्चित करणारा १४ ऑगस्ट रोजीचा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी यापुर्वीच मान्य झाली होती. यानंतर रखडलेली आरक्षित पदभरती तातडीने करावी, बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, डीबीटी योजना रद्द करून वसतिगृहातच भोजन व्यवस्था करावी, सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू ठेवले होते




